Description
महात्मा फुले हे तुकोबांचा विचार चालवणारे वारकरीच होते, यात संदेह नाही. शेतकऱ्याचा कळवळा दोघांनाही आहे. तुकोबा शेतकरी होते. कुणबी असल्याचा त्यांना अभिमान होता. फुल्यांनीही मांजरी या गावी दोनशे एकर शेती घेऊन स्वतः कसली होती. शेतकऱ्यांपुढे एक आदर्श ठेवला होता. तुकोबांनी शेतकऱ्याची कर्जखते बुडवून आपल्या सामाजिक संघर्षाची सुरुवात केली होती. तर फुल्यांनी प्रथम शेतकऱ्यांचा कैवार घेऊन आंदोलन केले. संपूर्ण आयुष्यच शेतकऱ्याच्या कल्याणासाठी घालवले. ज्या काळी ब्राम्हण लेखक चवचाल साहित्य निर्माण करीत होते. त्या काळात शेतकऱ्यांची वेदना फुले मांडत होते. शेतकरी हा विषय साहित्याचा करून नवे परिणाम मिळवून देण्यात फुल्यांचा मोठा वाटा आहे. बळीराजाचा घेतलेला कैवार किती सार्थ होता याची प्रचिती तुकोबाचे अभंग वाचल्यावर यावी. वामन हा कपटी बामन आहे हे संशोधन मांडून फुल्यांनी त्याच्यावर प्रहार केला परंतु तुकोबा अवतार कल्पनेतून विचार करतानाही वामनाची बाजू घेत नाही तर बळीराजाची बाजू घेतात. हे अत्यंत महत्वाचे आहे. डॉ.आ.ह. साळुंखे यांनी ‘बळीवंश’ मध्ये तुकोबांची हि बळी प्रेरणा साधार दाखवून दिली आहे. शेतकऱ्यांचे म्हणजेच बळीचे राज्य पुन्हा निर्माण करण्याची प्रेरणा तुकोबांनी शिवाजी राजांना दिली हा इतिहास आपणांसमोर आहेच. त्याचा गौरवपूर्ण उल्लेख फुल्यांनी केलाच आहे. एवढेच नाही तर कुळवाडीभूषण छत्रपती शिवाजी राजांचा पोवाडा लिहून आपली बळीनिष्ठा,शिवनिष्ठा, व्यक्त केली आहे.






Reviews
There are no reviews yet.